करमाळा, प्रतिनिधी – उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अमोल विजयसिंह परदेशी यांनी शहरातील कानाड गल्ली येथे स्वखर्चातून बोअर घेतला आहे. मंगळवार दि.३१ रोजी सकाळी आठ वाजता कानाड गल्ली मध्यवर्ती ठिकाणी हा बोअर घेण्यात आला आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि जुनी झालेली पाईपलाईन, दहिगाव पंपिंग स्टेशनला होणारा वीजपुरवठा, अपघात किंवा इतर कारणांनी होणारी पाणी गळती यामुळे अनेक वेळा करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बाधा येतात. याशिवाय उन्हाळ्यात तर सगळीकडेच गंभीर पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून अमृत २ योजनेसाठी करमाळा नगरपालिका प्रयत्नशील असल्याचे दिवाबत्ती व पाणीपुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी यांनी सांगितले असले तरी ही मोठी योजना मंजूर होण्यापासून कार्यान्वित होण्यापर्यंत बराच कालावधी जाणार आहे. तोपर्यंत अमोल परदेशी यांनी स्वखर्चातून घेतलेल्या बोअरचा कानाड गल्लीतील नागरिकांना मोठा आधार ठरणार आहे.

यावेळी अमोल परदेशी यांच्यासह कानाड गल्लीतील जेष्ठ नागरिक चोपडे गुरुजी, अशोकमामा ढवळे, अशोक कणसे, बाबा माने, योगेश राखूंडे, सचिन काळे, भागवत घोगरे, सोहेल बागवान, संकेत दयाळ, संतोष माने, विश्वजीत परदेशी आदी जण उपस्थित होते.

अमोल परदेशी यांच्याकडून कानाड गल्ली येथे स्वखर्चातून बोअर घेतला जात असल्याचे पाहून नागराज गल्लीतील नागरिकांनीही यांच्याकडे नागराज गल्ली येथे बोअरची मागणी केली. यावेळी परदेशी यांनी नागराज गल्ली येथेही लवकरच बोअर घेऊन देण्याचे मान्य केले आहे. परदेशी यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

.

.

