करमाळा, रविंद्र चव्हाण – तालुक्यातील केतूर (नं.२) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेला उद्या (बुधवार दि.८) पासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

केतुर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ वार्षिक यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी व सप्तमी अशी दोन दिवस भरते. परंपरेनुसार बुधवारी रात्री माता जोगेश्वरी व भैरवनाथ यांच्या मुर्त्यांना महिला भक्तांकडून हळद लावली जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी ९ वाजता भीमा नदी काठी दोन्ही मुर्त्यांना शाही स्नान घालण्यात येईल. यानंतर ठीक १० वाजता मंदिरामध्ये अभिषेक संपन्न होईल व मुख्य यात्रेला सुरुवात होईल. यात्रेच्या निमित्ताने भक्तांच्या वतीने ठिकठिकाणी भंडारा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दरम्यान गुरुवारी रात्री ८ वाजता माता जोगेश्वरी व भैरवनाथ यांचा शाही विवाह सोहळा सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्यानंतर रात्री दहा वाजता मुख्य छबिना मिरवणूकीला सुरुवात होणार आहे.

याशिवाय या यात्रेत लहान मुलांसह आबाल वृद्धांच्या मनोरंजनासाठी पाळणे, मिठाई, खेळणी, सौंदर्य प्रसाधने आदी पर्वणी असणार आहे. या यात्रा सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने उदयसिंह मोरे पाटील व सरपंच सचिन वेळेकर यांनी केले आहे.

.

.

.

.

