एच.एस.सी. बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता १२ वीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली. गुरुवार दि.१२ रोजी असलेल्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपर वेळी परीक्षार्थी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

एच.एस.सी. परीक्षेचे य. च. महाविद्यालय हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र (केंद्र क्रमांक ०४२१) आहे. या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तसेच महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करमाळा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील एकूण ११०४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेसाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा पुरवण्यात आल्या असून परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर सामग्री सज्ज करण्यात आली आहे, ज्यामुळे परीक्षा केंद्र सुरक्षित आणि व्यवस्थित राहिले आहे.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आणि उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरच्या दिवशी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. माने, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, केंद्र संचालक प्रा. ज्ञानदेव कुंभार आणि इतर प्राध्यापकांच्या हस्ते त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सालाबादप्रमाणे या परिक्षा केंद्रात कॉपी मुक्त परीक्षा राबवून शिक्षणाचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व यंत्रणा यशस्वीपणे काम करत असल्याची प्राचार्यांनी सांगितले आहे.

.

.

.

