करमाळा, प्रतिनिधी – उजनी जलाशय परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी नियमित आठ तास वीजपुरवठा करावा, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, उजनी प्रकल्पासाठी करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी संपादित करून दिल्या. प्रकल्पग्रस्त असूनही गेल्या तीन वर्षांपासून शेतीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत आहे.

सध्या उजनी धरणात सुमारे ५२ टक्के पाणीसाठा असून तो वाढत आहे. धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असतानाही शेतीपंपांना नियमित आठ तास वीज दिली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तातडीने नियमित आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा १७ जुलैपासून चिकलठाण येथील टोपेबाबा मंदिरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर इन्नुस दिलावर सय्यद, अविनाश मारुती सरडे, योगेश दत्तात्रय सरडे, सचिन आनंदराव गावडे, शंकर रामचंद्र बोंद्रे, दादासाहेब राजाराम सरडे, रणजीत भारत गव्हाणे, संदीप बबन सरडे आदी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

.

.

.

.

