चहा आणि शुद्ध पाण्यासह विक्रमी १७,६४३ बिस्किट पुड्यांचे वाटप
करमाळा, प्रतिनिधी – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांसाठी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने चार दिवस चहा व बिस्किट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. चार दिवस चाललेल्या या उपक्रमा अंतर्गत प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना चहा आणि शुद्ध पाण्यासह विक्रमी १७,६४३ बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

आषाढी वारीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून अनेक दिंड्या-पालख्या करमाळा मार्गे पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. पंढरपूर गाठताना या दिंड्या पालख्यांचे करमाळ्यापासून मोजकेच टप्पे उरलेले असतात. बहुतेक दिंड्या पालख्यांची शहरासह लगतच्या ग्रामीण भागात अनेकांकडे भोजनाची व्यवस्था होत असली तरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे सकाळी लवकर निघणाऱ्या भाविकांना चहा पाण्याची सोय होणे दुरापास्त असते.

ही बाब लक्षात घेऊन कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने शुक्रवार दि. १७ जुलै ते सोमवार दि.२० जुलै २०२६ या कालावधीत वारकऱ्यांना चहा बिस्किटे पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला. शुक्रवारपासून सोमवार पर्यंत सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत असे दोन वेळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना तब्बल १७,६४३ बिस्किट पुड्यांचे वाटप बिस्किटांच्या पुड्यांसह वारकऱ्यांना चहा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.

करमाळा शहरातून पंढरपूरकडे जात असताना सुरू असलेल्या रिमझिम पावसात वारकऱ्यांना बिस्किटांसोबत मिळालेला निर्भेळ दूध, दर्जेदार चहापत्ती आणि आले घातलेला गरमागरम चहा भाविकांना मायेची ऊब देऊन गेला. वाटपा दरम्यान बिस्कीट पुड्यांची वेस्टने आणि वापरलेल्या चहाच्या कपांची वेळचे वेळी स्वच्छता करण्यात आली. वारकऱ्यांसह वाहनांची गर्दी लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी चहा-बिस्किटे वाटपासोबत वाहतूक सुरळीत करण्याचेही काम केले. कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

.

.

.

.

.

.

