प्रहार संघटना व सामाजिक युवा ग्रामस्थांचा समाजोपयोगी उपक्रम; विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन
करमाळा, प्रतिनिधी – शेतकरी, दिव्यांग, निराधार, कामगार व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सातत्याने मांडणारे लोकनायक शिवसेना विधानपरिषद आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील केम येथील सामाजिक युवा ग्रामस्थ आणि प्रहार संघटना, करमाळा तालुका यांच्या वतीने केम येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा संचलित श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयात खाऊ वाटप व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.पी. ग्रुपचे संस्थापक अच्युत (काका) पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सागर दौंड, आनंद शिंदे तसेच प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. चव्हाण सर यांनी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जाधव मॅडम यांनी विद्यालयाच्या कार्याची व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी संदीप तळेकर म्हणाले, “आमदार बच्चुभाऊ कडू यांनी समाजातील वंचित, शेतकरी, दिव्यांग व गरजू घटकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही समाजसेवेचे व्रत जोपासत आहोत. भविष्यात विद्यालय किंवा विद्यार्थ्यांना कोणतीही गरज भासल्यास प्रहार संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”

यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा व प्रोत्साहनही देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मानले.
यावेळी मुख्याध्यापक नाळे सर, आदेश सपकाळ, प्रथमेश पवार, विद्यालयाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सागर कुरडे, योगेश ओहोळ, सचिन तळेकर, बापू नेते तळेकर, भारत नागणे, सुनील चव्हाण, राजेंद्र देवकर, सागर गायकवाड, भाजप सरचिटणीस धनंजय ताकमोगे, केळी व्यापारी गीते साहेब तसेच केम गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमामुळे मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

.

.

.

.

.

